॥ जय श्री राम ॥
श्रीमहाराज गेल्या नऊ- दहा वर्षांपासून गोंदवल्यातच स्थिर राहिले होते. त्यामूळे त्यांचा लोकसंग्रह फार वाढला होता. श्रीमहाराजांकडे त्यानिमित्ताने अनेक लहान मोठे लोक गोंदवल्यात येत. आपल्या मुलाला लोक इअतका मान देतात याचे श्रीमहाराजांच्या आईला गीताबाईंना फार कौतुक वाटे. याच काळांत श्रीमहाराजांना दोन मुलें झाली; परंतु ती दोन्ही लहानपणींच वारली.
वयोमानामुळे गीताबाई आता थकल्या होत्या. श्रीमहाराजांनी आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत. असेच एकदा श्रीमहाराजांनी आपल्या आईला तिची काही इच्छा असल्यास त्याबाबत विचारले. त्यावर आईने आता केवळ काशीयात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमहाराज यापूर्वी बरेच वेळा काशीस जाऊन आले होते पण एकटे व पायी यावेळेस मात्र श्रीमहाराज आपल्या आईला घेवून आगगाडीने काशीस जाण्याचे ठरवीले. त्याप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली. शंभरच्या वर स्त्री व पुरूषांना घेवून श्रीमहाराज आपल्या आईला घेवून काशीस गेले. काशीला मसूरियादीन शिवमंगल नांवाचा एक ब्राह्मण श्रीमहाराजांचा पंडा होता. तो श्रीमहाराजांना गुरूस्थानी मानीत असे. त्यांने श्रीमहाराजांची व्यवस्था एका संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती. श्रीमहाराज तेथें एक महिनाभर राहिले. आईला रोज स्वत: उचलून गंगास्नानासाठी श्रीमहाराज घेवून जात.या मुक्कामांत श्रीमहाराजांनी पाच सहस्त्रभोजने, तीन इच्छाभोजने, भिका-यांना पांच भोजने आणि तीन संन्याशी भोजने घातली. काशीमध्ये एक महिनाभर राहून श्रीमहाराज आईला घेवून गयेला गेले.तेथें पिंडदान करून सर्व मंडळी आयोध्येला गेली. गीताबाईंची प्रकृती क्षीण होऊ लागली. औषधोपचारस त्यांनी नकार दिला. त्या फक्त दुधावरच राहू लागल्या. नामस्मरण मात्र चालू होते. श्रीमहाराज त्यांची सेवा करीत होते. चार पाच दिवसांनंतर गीताबाईंनी श्रीमहारजांना अंतकाळ जवळ आल्याचे सांगून आता केवळ शरयू नदीत स्नान करावयाची व रामरायाचे अखेरचे दर्शन घ्यावयाची इच्छा व्यक्त केली. आईच्या शेवटच्या इच्छेप्रमाणॆ श्रीमहाराजांनी गीताबाईंना शरयू नदीमध्ये स्नान घालून तेथील घाटावर एक गादी टाकून त्यावर बसविले. आईच्या हातून पुष्कळ दानधर्म व्हावा या हेतूने श्रीमहाराज गीताबाईंना म्हणाले ” आई, या गादी खाली मी काही पैसे ठेवले आहेत.तुला हवे तेवढे पैसे तु दान कर.” पंचक्रोशीतील सर्व गरीब, भिकारी ,गोसावी, वैदिक इ सर्व लोक दान घेवून संतुष्ट होऊन जाऊ लागले. मात्र पैशांनी भरलेली गीताबाईंची मूठ मात्र तशीच रहात. सर्वांना मूठ भरून पैसे देऊन सुद्धा गादी खालचे पैसे काही संपेनात तेंव्हा गीताबाई श्रीमहाराजांना म्हणाल्या ” अरे गणू , या गादीखाली अजून किती पैसे आहेत. ” त्यावर श्रीमहाराज उत्तरले ” आई, या गादीखाली पैशांची गंगा वाहत आहे. गीताबाईंनी मनसोक्त दानधर्म केल्यावर श्रीमहाराजांनी रामास नैवेद्य दाखवून आयोध्येतील सर्व लोकांना गांवजेवण घातले. दुस-या दिवशी गीताबाईंनी श्रीमहाराजांच्या मांडीवर ’राम राम’ म्हणत देह ठेवला. आई गेल्यावर श्रीमहाराजांना अश्रू अनावर झाले . श्रीरामराया नंतर श्रीमहाराजांचे आपल्या आई वर प्रेम होते.
गीताबाईंच्या अंत्यसंस्कारास सर्व गांव लोटला होता. तिस-या दिवसापासून श्रीमहाराजांनी आयोध्येत नाम सप्ताह बसविला. सर्व उत्तरक्रिया पार पाडून असंख्य गरिबांना अन्नदन केले. शंभर गाई दान दिल्या, शंभर सुवासिनींना लुगडी दिली, शंभर वैदिकांना वस्त्रे दान केली. एखाद्या राजालाही लाजवेल असा खर्च श्रीमहाराजांनी आपल्या आईसाठी केला.
॥ श्रीराम समर्थ ॥


॥ प्रतिक्रिया ॥