॥ जय श्री राम ॥
अगदी बालपणापासून श्रीमहाराजांची प्रभु श्रीरामावर नितांत श्रद्धा होती.श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की, जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्राच्या इच्छेनेच घडते, असे अक्षरश: रात्रंदिवस ते घोकीत असत. लोकांसाठी उपासनेचे केंद्र आवश्यक असल्याने आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास आरंभ केला.
मंदिराच्या बांधकामासाठी गोंदवल्यातीलच गवंडी व सुतार यांची नेमणूक श्रीमहाराजांनी केली. मंदिराचा नकाशा त्यांनी स्वत: तयार केला. श्रीमहाराजांच्याकडॆ साठविलेले द्रव्य असे मुळीच नव्हते; आणि मंदिराच्या बांधकामासाठी श्रीमहाराजांनी कधीही, कोणाकडॆही पैशासाठी याचना केली नाही. दररोज श्रीमहाराजांच्या दर्शनास येणारे लोक आपण होऊन त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावरच बांधकामाचा सर्व व्यवहार चालत असे.
असेच एकदा गुरूवारी गोंदवल्याचा बाजार होता. बांधकामावरच्या सर्व माणसांना आठवड्याची मजूरी द्यावयाची होती. बांधकामाचे साहित्यही संपलेले होते. आदल्याच दिवशी श्रीमहाराजांनी सर्व गावास जेवण दिल्यामूळे त्यांच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. बाजारचा दिवस असल्यामूळे मजूरांना पैसे देणे आवश्यक होते. सर्व काही प्रभु रामचंद्रावर सोपवून श्रीमहाराजांनी सर्व कामक-यांना जेवू घातले व राम नामस्मरण करीत बसण्यास सांगितले. काही कालानंतर म्हसवडचे बापूसाहेब माने श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. त्या वर्षी त्यांनी आपल्या शेतामध्ये ऊसाचे पिक घेतलेले होते. ऊस विकून आलेल्या पैश्यांपैकी शंभराला पांच रूपये श्रीमहाजांना अर्पण करण्याचे त्यांनी आपल्या मनाशी ठरविलेले होते. बापूसाहेबांनी श्रीमहाराजांना नमस्कार करून श्रीमहाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेवून निघून गेले. ते गेल्या नंतर श्रीमहाराजांनी नामस्मरण करणा-या सर्व मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली. आणि बांधकाम साहित्य आणावयास मुकादमास पैसे दिले. वरील प्रसंगानंतर श्रीमहाराज बोलले,” रामरायाने आपली लाज राखली.पण मंदिर त्याच्यासाठींच होणार असेल तर त्याची काळजी त्यालाच असली पाहिजे. “
श्रीरामरायाचे मंदिर बांधावयास सुरूवात तर केली, पण श्रीरामाच्या मूर्तीविषयी काहीच खटपट दिसेना. सर्व लोक मूर्ती बद्दल श्रीमहाराजांना विचारीत. त्यावर श्रीमहाराज म्हणत ” तो रामराया आपण होऊनच येईल “
गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर तडवळे या गांवी कुलकर्णी आडनावाचे एक श्रीमंत गृहस्थ रहात होते.ते अत्यंत भाविक होते. त्यांच्या मनांत रामाचे मंदिर बांधावे असे येवून त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. मंदिरासाठी त्यांनी श्रीराम, लक्ष्मण व सीता अशा तीन मूर्ती करवून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. साठविलेल्या पैशातून त्यांनी गावीच एक सुंदर वाडा बांधला. परंतू दुर्दैवाने एके दिवशी त्या वाड्याला आग लागून सर्व वाडा उध्वस्त झाला. वाड्यातील मूर्तींनाही त्या आगीची झळ पोहचली. काहीं दिवसांनी सलग तीन दिवस कुलकर्ण्यांच्या स्वप्नात श्रीरामाची ती मूर्ति येई व सांगे ” मला तू किती दिवस इथं ठेवणार आहेस ? मला गोंदवल्यास, ब्रह्मचैतन्यांच्याकडे पोहचव. ” त्याच दरम्यान श्रीमहाराज श्रीरामाचे मंदिर बांधत असल्याचे त्यांना कळले. म्हणून त्यांनी त्या तिन्ही मूर्ती गोंदवल्यास श्रीमहारांजांकडे आणून दिल्या.
शके १८१३, सन १८९१ मध्ये मंदिर बांधून तयार झाले. बापूसाहेब माने यांनी सिहांसन करविले. श्रीमहाराजांनी म्हासुर्णेकर शास्त्रींच्या संमतीने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरविला. समारंभाची निमंत्रणे निरनिराळ्या गांवी दिली गेली. प्रतिष्ठापणेच्या सात दिवस अगोदर श्रीमहाजांनी स्वत: देवापुढें अखंड नामस्मरणाच्या सप्ताहास आरंभ केला. सप्ताहात येणा-या सर्वांबरोबरच सबंध गावास आठ दिवस जेवण्यास मुक्तद्वार होते. रोज भजन, नामस्मरण, किर्तन, भोजन यांची गोंदवल्यात अगदी गर्दी उडून गेली. समारंभानिमित्त श्रीमहाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. प्रतिष्ठापणेसाठी काशी, प्रयाग, आयोध्या, पुणे, सातारा वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान पंडित व वैदिक ब्राह्मण मुद्दाम आले होते. त्या दिवशी गोंदवल्यास मोठ जनसमुदायाचा पूर आला होता. श्रीमहाराज अगदी तेजपु:ज दिसत होते. अंगामध्ये नवी जरीची भगवी कफनी, पायांत नव्या खडावा, कपाळाला मोठे केशरी गंध आणि गळ्यात तुळशीची माळ; श्रीमहाराजांची मूर्ती अगदी विलोभनीय दिसत होती. सर्व गर्दीच्या आकर्षणाचे केंद्र श्रीमहाराज होते.
श्रीरामाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे व समुद्राचे पाणी आणण्यात आले होते. श्रीमहाराजांनी आमंत्रितांना काही ना काही भेटवस्तू दिल्या. प्रत्येक विद्वानास एकेक रेशमी वस्त्र व एकेक होन दिला. मंदिराचे बांधकाम करणा-या प्रत्येक कारागीरास एकेक धोतर व मुंडासे व पांच रूपये दिले. समारंभास आलेल्या प्रत्येक सुवासिनेची खणा नारळांनी ओटी भरण्यात आली. अन्नदानास तर सीमाच नव्हती. शेवटच्या दिवशी तर लोकांच्या पंक्तिवर पंक्ति उठत होत्या. एका त्या दिवशी गोंदवल्यात दहा हजार लोक जेवून तृप्त झाले.
॥ श्रीराम समर्थ ॥



॥ प्रतिक्रिया ॥