॥ जय श्री राम ॥
उज्जैनहून श्रीमहाराज इंदूरला वास्तव्यास आले. तेथील एक प्राध्यापक श्रीमहाराजांकडे नेहमी येत असे. तो जितका बुद्धिमान तितकाच अश्रद्ध होता, परंतू प्रामाणिकही होता. त्याचे व श्रीमहाराजांचे बराच काळ संभाषण चाले.त्यांत तो अनेक शंका,प्रश्न श्रीमहाराजांना विचारीत असे आणि श्रीमहाराज देखील त्याच्या सर्व प्रश्ननांना अत्यंत प्रसन्नपणे उत्तरे देत. एक दिवस तो म्हणाला, “महाराज, आपण न मागतां, लोक आपल्याला इतकी मेवा मिठाई आणि फळफळावळ कां देतात ? ” श्रीमहाराज हसून बोलले,” हा प्रारब्धाचा गुण आहे. आपले अन्न वस्त्र,पैसा,मान-अपमान व शरीर दु:ख या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत.” हे एकून तो गप्प बसला घरी गेल्यावर प्राध्यापकाने पुष्कळ विचार केला,परंतू प्रारब्धाचा हा सिद्धांत त्याला काही पटेना. दुस-या दिवशी श्रीमहाराजांकडे आल्यावर तो जरा बाजूला बसला. काहीं वेळानंतर श्रीमहाराजांच्या दर्शनास एक गृहस्थ आला व त्याने श्रीमहाराजां पुढे एक अत्तराची कुपी ठेवली. आणखी काही काळ गेल्यानंतर दुसरा गृहस्थ आला,त्याने श्रीमहाराजांकडे ती अत्तराची कुपी मागीतली श्रीमहाराजांनी त्याला ती देऊन टाकली.आणि प्राध्यापकाकडॆ बघून श्रीमहाराज म्हणाले,” प्रारब्ध असा खेळ करीत रहाते.” “तुम्ही नोकरी चाकरी करणार,घरदार संभाळून प्रपंचात रहणार,आणि आमच्यासारख्या गोसाव्यापुढे मिठाई येऊन पडते याचे वैषम्य वाटून घेणार ! जरासे धाडस कर, आणि मग पहा काय घडते तें! ” श्रीमहाराजांच्या या बोलण्याचा त्या प्राध्यापकाच्या मनावर इतका मोठा परिणाम झाला की तो श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार करूनपुढे नोकरी सोडून निघून गेले. पुढे आठ-दहा वर्षांनी आयोध्येत श्रीमहाराजांना पुन्हा भेटला.
इंदूरात बरेच दिवस वास्तव्य केल्या नंतर इंदूरातीलच भय्यासाहेब व जीजीबाईला घेवून श्रीमहाराज, श्रीतुकामाईंचे दर्शन घेण्याकरिता येहळेगावी जाण्यास निघाले. एक महिन्याच्या प्रवासानंतर ती सर्व मंडळी येहळेगावी पोहचली. प्रवासात श्रीमहाराजांनी सर्वांना सक्त ताकीद दिली होती कि; येहळेगावाला असे पर्यंत कोणीही त्यांना ’महाराज’ म्हणायचे नाही, अगर त्यांच्या पाया पडायचे नाही. श्रीतुकामाईंची भेट घेतल्या नंतर श्रीमहाराज बरोबरच्या मंडळींना घेवून गोंदवल्यास परतले. आठ पंधरा दिवस राहून इतर मंडळी इंदूरला परतली. यानंतर सन १८९० पासून श्रीमहाराज गोंदवल्यास बरेच स्थिर रांहू लागले त्यांचे वय आता ४५-४६ च्या आसपास होते. बाहेरच्या पुष्कळ लोकांना त्यांच्या बद्दल माहित झाल्याने व गोंदवल्यास त्यांचे वास्तव्य स्थिर झाल्याने लोकांचे त्यांच्याकडॆ येणे जाणे खूप वाढले.
वयाच्या नवव्या वर्षापासून वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत श्रीमहाराजांनी आपला पुष्कळसा काळ हा पर्यटन करण्यात व्यतीत केला. परमार्थाकडॆ खरी प्रवृत्ती असणारे किती लोक अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्रीमहाराज सबंध भारतवर्ष तीन वेळा पायी हिंडले. इतक्या अफाट पर्यटनामध्ये श्रीमहाराजांना अक्षरश: लाखो लोक भेटले. ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. तसेच कर्मकाण्ड हेंच जिवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणा-या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातांत माळ घेवून रामनामाचा जप करायला लावले. संपूर्ण भारत खंडात श्रीमहाराजांना पुष्कळ साधू पुरूष आढळले परंतू या प्रवासामध्ये श्रीमहाराजांना केवळ तीनच साध्वी स्त्रिया त्यांच्या पाहण्यात आल्या असे श्रीमहाराज सांगत इतकेच नाही तर त्या स्त्रिया संसारी होत्या. प्रवासामध्ये अनेकांना त्यांनी गुरूत्व दिले परंतू त्यापैकी पुष्कळांना श्रीमहाराज कोठले हे माहित नसल्याने ते लोक गोंदवल्याला आलेच नाहीत.
पंढरपूरचा रस्ता गोंदवल्यावरून जात असल्याने अनेक साधू, संन्याशी लोक जाता येता वाटेत गोंदवल्यास मुक्काम करीत. मध्यम स्थितीतील संसारी लोक गोंदवल्यास येत. याशिवाय पंढरीची वारी करणारे वारकरी देखील थांबत असत. श्रीमहाराज गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यामूळे प्रापंचिक लोक आपल्या बायका मुलांना घेवून श्रीमहाराजांच्या दर्शनाला येवू लागले. दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने गोंदवल्यास मुक्काम करणा-यांची संख्या वाढू लागली. श्रीमहाराजांच्या घरातील जागा अपूरी पडू लागली. शिवाय गोंदवल्यास नियमित येणा-या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणा-या नेहमीच्या लोकांना उपासनेचे केंद्रही आवश्यक होते.
॥ श्रीराम समर्थ ॥


॥ प्रतिक्रिया ॥